पायाखालचं गाव
दिवाळी आणि लहानपणाचं अतुट नातं असतं.तुमचं वय आणि समज भले कीतीही वाढो अंतरंगात मात्र बालपणाचेच फटाके उडत असतात. आज मुलासोबत होणारी शहरी दिवाळी ज्यामध्ये सर्व काही उपलब्ध आहे सोप्या भाषेत अगदी ऑनलाईन तर आपण साजरी केलेली ग्रामीण भागातील दिवाळी ज्यामध्ये भले वस्तुंची वाणवा असेल पण माणसांची, नात्यांची सुबत्ता नक्कीच होती.
चार भाऊ,चार बहिणी, आई-वडील अशा भरभक्कम कुंटुंबात माझं बालपण गेलं. वडील प्राथमिक शिक्षक तर आई गृहिणी. पैशाची सुबत्ता कधीच नव्हती मात्र फार काही अडचण होती असही नव्हतं किमान मला तरी तसं कधी जाणवलं नाही.
त्याकाळी पंधरा दिवस आधीच बायकांची फराळ निर्मितीची घाई सुरु झालेली असे माझी आई मात्र शांतच ती एकदम सुगरण इतर घरातील स्त्रिया आईकडे सल्ला मागण्यासाठी यायच्या आईने आनंदाने त्यांना टिप्स द्यायच्या. माझी मात्र घालमेल सुरु होई वडीलांना बोलण्याची टाप नव्हती आईच्या मागे माझी सतत भुणभुण सुरु होई,"तु कधी सुरु करणार आहेस फराळ बनविणे"?. आई नेहमीप्रमाणे शांतच. कसे? माहीत नाही अगदी दोन दिवस आधी किराणा घरी यायचा व आईची लगबग सुरु व्हायची. चकल्या-शंकरपाळ्यापासुन ते बेसणाच्या लाडुपर्यंत , पोहे-मुरमुर्याचा चिवडा,अनारसे सर्व एकदम तयार बरे प्रत्येकाची चव व मिजास काही वेगळीच. आईच्या हातुन काही बिघडले असे कधीच झाले नाही.
माझ्या वडीलांचे एक ठाम मत होते सण म्हणजे फक्त गोडधोड खाणे, बाकी कपडे, फटाके म्हणजे फिजुल खर्च त्यामुळे फटाके मिळणे दुरापास्त तरीही माझ्या रडण्यामुळे त्याकाळचे प्रसिद्ध कावळे, लवंगी फटाकड्या व नेहमीच्या टिकल्या आमच्याकडे यायच्या. आमच्याकडे एक लोखंडी उखळी होती त्यामध्ये टिकल्या किंवा गंधक टाकुन ती भिंतीवर आपटत आमची स्वारी गल्लीभर हुंदडत असायची.
नरक चतुर्थी ला पहाटे उठुन बोचर्या थंडीत केलेली आंघोळ, पाडव्याची पुजा व भाऊबीजेची ओवाळणी, उटण्याचा वास, फराळाची लज्जत,मित्रासोबत मारलेल्या अघळपघळ गप्पा या सार्यांच्या आठवणीचं ओझं घेतच आयुष्य पुढे सरकत आहे.
आज आई नाही, वडील नाहीत त्यांच्या आठवणीने डोळे पाणावल्याशिवाय रहातच नाहीत.
याच पाणावलेल्या डोळ्यांनी आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.....
नितीन कुलकर्णी, पुणे
खूपच छान !!
ReplyDeleteThanks Milind
DeleteThanks Milind
Delete